आपल्या दैनंदिन जीवनात काही दुर्गुण नकळतपणे आपल्याला चिकटतात आणि वरवर पाहता अगदी निरुपद्रवी वाटण्याऱ्या गोष्टींचे आपल्या जीवनावर आणि नात्यांवर खोलवर परिणाम होतात.
हट्टीपणा म्हणजे सारासर विचार न करता मनाला येईल तसं वागणं. यात विवेकाची जागा मनाचा दुराग्रह घेतो. स्वतःचं खरं करणं म्हणजे दुसऱ्याचं म्हणणं कितीही योग्य असलं तरी शेवटी “मीच बरोबर” हा आग्रह धरणं. यातून संवाद आणि सहकार्य कमी होत जातं आणि पोकळ अभिमान म्हणजे केवळ मोठेपणाचा देखावाच. जिथे खरी गुणवत्ता अंगी नसताना तसा भ्रम निर्माण करून स्वतःला मोठं दाखवायचं असतं.
धार्मिक दृष्टीनेही या गोष्टींना दोष मानलं आहे. भगवद्गीतेत हट्टीपणा व अभिमान हे आसुरी गुण सांगितले आहेत. संतसाहित्यात अभिममान हा आत्मबोधाला अडथळा आहे असं सांगितलंय. म्हणूनच नम्रता, विवेक आणि सत्यवचन या गुणांचा अंगीकार करणं आवश्यक आहे.
व्यवहारात बघितलं तर हट्टीपणामुळे नातेसंबंध ताणले जातात, स्वतःचं खरं करणं आपल्याला एकटं पाडतं आणि पोकळ अभिमानामुळे आपण लोकांच्या नजरेत विश्वास गमावून बसतो. त्यामुळे या दुर्गुणांना जाणीवपूर्वक ओळखून त्यांवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे.
आपलं खरं मोठेपण हे दुराग्रहात किंवा दिखाव्यात नसून नम्रता, सहकार्यशीलता आणि सत्याशी प्रामाणिक राहण्यात आहे.